दिंडीचे निगडी येथील भक्ती शक्ती चौकात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह यांनी केले स्वागत
| सांगावा न्यूज | पिंपरी, १९ जून २०२५ : ज्ञानोबा-तुकाराम या जयघोषात, रिमझीम पावसात पंढरपूरच्या दिशेने हरिनामाचा गजर करत मार्गस्थ झालेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे शहरात आगमन झाले आणि पिंपरी चिंचवड नगरी भक्तीभावात मग्न झाली. अखंड हरिनामाच्या गजरात निघालेल्या या दिंडीचे निगडी येथील भक्ती शक्ती चौकात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह यांनी स्वागत केले.
यावेळी आमदार उमा खापरे,महेश लांडगे, महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, नितीन देशमुख, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उप आयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, निलेश भदाणे, सचिन पवार, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी,सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दिंडी प्रमुखांना कापडी पिशवी, प्रथमोपचार पेटी, संपर्क क्रमांक असलेली माहिती पुस्तिका तसेच झाडांच्या बिया, पुष्पहार आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वृक्षारोपण, वृक्षदिंडी, हरीतवारी असे विविध उपक्रम देखील महापालिकेच्या वतीने राबविण्यात आले. स्वागताच्या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभंग गायनाचा कार्यक्रम सादर केला. पारंपरिक वेशभुषेत असलेले आयुक्त शेखर सिंह यांनी अभंगावर ठेका धरत वारीत सहभाग घेतला तसेच पखवाज वादन आणि फुगडीचाही आनंद घेतला.
आषाढीवारीच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने स्थापत्य, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्थेबरोबरच यंदाची वारी पर्यावरणपूरक, प्लास्टिक मुक्ती, हरितवारी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले होते. पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, पालखी मुक्काम, वारकरी निवास आणि पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात शौचालयांची व्यवस्था करण्यात आली.
आकुर्डी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामासाठी विसावला. दिंड्यांचा मुक्काम ज्या महापालिकेच्या शाळांमध्ये असतो तसेच इतर खासगी ठिकाणी असतो तेथे महापालिकेच्या वतीने आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पुरेसे शौचालय, स्नानगृह, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा अशा आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देताना प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र समन्वयकाची नेमणूक करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यासोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका तसेच अग्निशमन वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्वागत कक्षाच्या ठिकाणी माजी लोकप्रतिनिधीचींही उपस्थिती
माजी महापौर राहूल जाधव,माजी उपमहापौर राजू मिसाळ,माजी नगरसदस्य नामदेव ढाके,चंद्रकांत नखाते, मारुती भापकर,राजू दुर्गे, सचिन चिखले,उत्तम केंदळे, शर्मिला बाबर,कमल घोलप,अश्विनी जाधव, स्वीनल म्हेत्रे,साधना मळेकर यासह विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा