Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, २१ जुलै, २०२६

फोर्स फ्रेंड्स ग्रुपच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान, वृक्षारोपण अन्नदानासह सामाजिक उपक्रम; विविध क्षेत्रातील उद्योजकांचा गौरव


| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २१ जुलै २०२६ : फोर्स फ्रेंड्स ग्रुपच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त  रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि वारकऱ्यांसाठी अन्नदान अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ग्रुपचे अध्यक्ष संतोष (दादा) कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना संतोष कांबळे म्हणाले, समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेतून फोर्स फ्रेंड्स ग्रुप गेली अनेक वर्षे विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. रक्तदान शिबिरांमधून आतापर्यंत १,८०० हून अधिक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत झाली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड आणि करमाळा परिसरात १० हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली असून, भविष्यातही समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष राजू पेठे, आदर्श शिक्षक आण्णा हेळकर, विशाल परदेशी, उद्योजक बाळासाहेब कांबळे आणि माजी सरपंच हनुमंत ढावरे प्रमुख उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या फोर्स फ्रेंड्स ग्रुपच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा 'उद्योजक पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला. सतीश शिंगारे, इरफान सय्यद, श्रीनिवास हजारे, नारा गोपी, निलेश शिंदे आणि गणेश हजारे यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास स्वप्निल भोसले, बापू गोरे, सोनू गायकवाड, पै. अमोल गायकवाड, बिरजू भोसले, अविनाश जाधव, दयानंद एडके, गणेश शिंदे, बाळासाहेब सांगळे, दीपक अडसूळ, बादल गस्ते, नितीन रोकडे, अंकुश बोटे, योगेश मथुरिया, निलेश येळवंडे, सुनील खडसे, हसन शेख, हुसेन मनियार, मनोज दोडके, चंद्रप्रकाश यांच्यासह फोर्स फ्रेंड्स ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेरीवाल्यांवर कारवाई; अन्यायाविरोधात आंदोलन छेडण्याचा पथ विक्रेता समिती सदस्यांचा इशारा!


| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड , दिनांक २१ जुलै२०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या पथ विक्रेत्यांवर (फेरीवाल्यांवर) महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून नाहक आणि कठोर कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे हजारो कुटुंबांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, याप्रकरणी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन मार्ग काढावा, अन्यथा कुटुंबासह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा 'पिंपरी-चिंचवड पथविक्रेता समिती'चे लोकनियुक्त सदस्य श्री किसन उर्फ माऊली भोसले यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी महापालिका प्रशासनाला तसेच अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांना आज निवेदन सादर केले आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या आणि मुद्दे

* कारवाईवर तत्काळ थांबवावी 
शहरात फेरीवाल्यांवर सुरू असलेली प्रशासकीय दंडात्मक आणि जप्तीची कारवाई त्वरित थांबवण्यात यावी.

 * ओळखपत्र व परवाने वाटप करण्यात यावे:
महापालिकेने बायोमेट्रिक सर्वेक्षण केले असले तरी हजारो पात्र विक्रेत्यांना अद्याप ओळखपत्र किंवा विक्री प्रमाणपत्र (License) मिळालेले नाही, ते त्वरित देण्यात यावे.

* टाउन वेंडिंग कमिटी'ची स्थापना:
 पथविक्रेत्या समितीची निवडणूक होऊन दोन वर्षे उलटली तरी समिती गठित झालेली नाही. त्यामुळे 'टाउन वेंडिंग कमिटी' (TVC) ची नियमित बैठक घेऊन हॉकर्स आणि नो-हॉकर्स झोन निश्चित केले जावेत.

* पुनर्वसनापर्यंत व्यवसाय करू द्यावा:
जोपर्यंत अधिकृत हॉकर्स झोनमध्ये पूर्ण सोयी-सुविधांसह पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत सध्याच्या जागेवर व्यवसाय करण्याची मुभा देण्यात यावी.

* गैरकायदेशीर आठवडे बाजार बंद करा:
 शहरात विविध ठिकाणी चुकीच्या पद्धतीने आठवडे बाजार सुरू असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम होते व हप्त्यातून एकदा नियमांचे उल्लंघन करून कारवाया केल्या जातात.

यावेळी सुधाकरजी इंगळे, अनील गुप्ता, अंकुश भोसले, सिमरन दीदी, मनीष गुप्ता , विनय सोनवणे, यांच्या सह असंख्य पथविक्रेत्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. जर महापालिका प्रशासनाने या रास्त मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अन्यायाकारक कारवाई थांबवली नाही, तर पथविक्रेत्यांना आपल्या कुटुंबासह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

"आम्ही कायद्याचा आदर करतो आणि शहराच्या वाहतुकीला किंवा सौंदर्याला बाधा आणू इच्छित नाही, परंतु आमच्या पोटापाण्याचा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे."
 ___श्री किसन उर्फ माऊली भोसले (सदस्य, पिंपरी-चिंचवड पथविक्रेता समिती)




वाकड रोड डांगे चौक येथील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी


| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २१ जुलै २०२६ : वाकड रोडवरील डांगे चौक येथे गेल्या अनेक महिन्यांपासून तीव्र वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून,या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की वाकड थेरगाव परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाढती वाहनसंख्या यामुळे डांगे चौकातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी सकाळ व संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून नागरिकांचा मौल्यवान वेळ, इंधन आणि आर्थिक नुकसान होत आहे. वाकड रोड डांगे चौक येथे सध्या कोणतीही प्रभावी व कायमस्वरूपी वाहतूक सिग्नल व्यवस्था नसल्यामुळे सर्व दिशांमधून येणारी वाहने एकाच वेळी चौकात प्रवेश करतात. त्यामुळे वारंवार वाहतूक विस्कळीत होऊन मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण होते. या चौकातून पीएमपीएमएल बस, रुग्णवाहिका,दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकांना वेळेत मार्ग मिळत नाही, कर्मचारी कार्यालयात उशिरा पोहोचतात तसेच स्थानिक व्यावसायिकांनाही याचा फटका बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेडने डांगे चौकात आधुनिक व समन्वयित वाहतूक सिग्नल यंत्रणा तातडीने कार्यान्वित करणे,गर्दीच्या वेळेत अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे, सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे प्रभावी नियंत्रण ठेवणे तसेच नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या मागणीसंदर्भातील निवेदन शहराध्यक्ष सतीश काळे कार्याध्यक्ष विशाल मिठे उपाध्यक्ष गणेश देवराम यांच्या स्वाक्षरीने वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांना सादर करण्यात आले असून नागरिकांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा संभाजी ब्रिगेडने व्यक्त केली आहे.

सोमवार, २० जुलै, २०२६

मोशी कचरा डेपोवर भोसरी मतदारसंघाशिवाय कचरा नको _पिंपरी चिंचवड मतदारसंघातील कचरा टाकण्यास तीव्र विरोध


कचरा प्रश्न पेटला : मोशी परिसरातील नगरसेवकांचा ‘‘एल्गार’’

| सांगावा न्यूज |  पिंपरी-चिंचवड, दिनांक २० जुलै २०२६ : मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आता या विषयावर मोशी परिसरातील लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मोशी कचरा डेपोवर केवळ मोशी अर्थात भोसरी विधानसभा मतदारसंघातीलच कचरा टाकावा आणि पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील कचरा येथे डंप करू नये, अशी ठाम मागणी नगरसेवक निखिल शिवाजी बो-हाडे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनात बो-हाडे यांनी म्हटले आहे की, मोशी कचरा डेपोवर ८ जुलै २०२६ रोजी कचऱ्याचा डोंगर वेस्ट टू एनर्जी प्रकल्पावर कोसळून भीषण दुर्घटना घडली. या घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू झाला असून, अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतरही शहरातील वाढत्या कचऱ्याचा भार मोशीवरच टाकण्याचा प्रयत्न होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, १९८२ पासून शहरातील कचऱ्याची विल्हेवाट मोशी येथे लावली जात असून, आज शहराची लोकसंख्या ४० लाखांच्या घरात पोहोचली आहे. शहरात दररोज सुमारे १,५०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत असून, त्यातील मोठा हिस्सा मोशी कचरा डेपोवर जमा होतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्य, पर्यावरण आणि सुरक्षिततेच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

मोशी परिसरातील नागरिकांनी गेली अनेक दशके शहराचा कचरा सहन केला असून, आता अन्य मतदारसंघातील कचरा मोशीत आणण्याचा कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही, असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे. पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र व पर्यायी कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने अन्य मतदारसंघांतील कचरा मोशी येथे टाकण्याचा निर्णय घेतल्यास स्थानिक नागरिक, सर्व नगरसेवक आणि ग्रामस्थांच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा बो-हाडे यांनी दिला आहे. प्रसंगी कचरा डेपोच्या प्रवेशद्वारांवर ठिय्या आंदोलन करून निषेध नोंदविण्यात येईल, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अधिकच चिघळला असून, आगामी काळात हा मुद्दा राजकीय आणि सामाजिक स्तरावर अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. महापालिका प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

“आमची भूमिका स्पष्ट आहे. मोशी कचरा डेपो हा भोसरी मतदारसंघाच्या हद्दीत असून, येथील नागरिकांनी पुरेसा त्याग केला आहे. पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र आणि शाश्वत कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे ही महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. मोशीकरांच्या आरोग्याशी, पर्यावरणाशी आणि सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही. प्रशासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही, तर स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसह लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल. मोशीकरांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून, आता न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील.”__निखिल बो-हाडे (नगरसेवक, भाजपा, मोशी)

रविवार, १९ जुलै, २०२६

पोलीस आयुक्तांना निवेदन दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा : मोशी कचरा ढिगारा दुर्घटना प्रकरण


मोशी दुर्घटनेप्रकरणी अँथनी लाराच्या संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १९ जुलै २०२६ : मोशी कचरा डेपो येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात झालेल्या भीषण दुर्घटनेत ९ निष्पाप कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदार कंपनी अँथनी लाराच्या सर्व संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी ठाम मागणी संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे कार्याध्यक्ष विशाल मिठे आणि उपाध्यक्ष गणेश देवराम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी कचरा डेपो येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत ९ कामगारांना जीव गमवावा लागला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली असली तरी आतापर्यंत केवळ प्रकल्प व्यवस्थापकाविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला असून कंपनीच्या मुख्य संचालकांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

संभाजी ब्रिगेडने यावर तीव्र नाराजी व्यक्त करत मोठ्या औद्योगिक प्रकल्पांमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेची अंतिम जबाबदारी कंपनीच्या मालकांची व संचालकांची असते असे नमूद केले आहे. त्यामुळे केवळ कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करून मुख्य जबाबदार व्यक्तींना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी करून दुर्घटनेस जबाबदार असलेल्या कंपनीच्या सर्व संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा त्यांना तात्काळ अटक करावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

दरम्यान या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास न्यायासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.

शनिवार, १८ जुलै, २०२६

आयोध्या राम मंदिरातील कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ मुळशी तालुक्यात ‘राम रक्षा आंदोलन’चे आयोजन

 

| सांगावा न्यूज | मुळशी, दिनांक १८ जुलै २०२६ : अयोध्या येथील श्रीराम मंदिरात झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच संलग्न संघटनांच्या वतीने ‘राम रक्षा आंदोलन’ आयोजित करण्यात आले आहे. राम मंदिर हे श्रद्धेचे प्रतीक असून त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या आंदोलनातून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.  "राम मंदिर हे श्रद्धेचे प्रतीक आहे, अशा श्रदस्थळी दान दिलेली रोख रक्कम व इतर वस्तूंची चोरी म्हणजे आमच्या श्रद्धेची चोरी आहे, भावनेची भक्तीची चोरी आहे.

राम मंदिरात भ्रष्टाचार हा असह्य आहे. रामाचा अपमान आम्हाला मान्य नाही!" असा संदेश देण्यात येणार असून, आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता हे आंदोलन माणादेवी मंदिर, माणगाव चौक (तालुका मुळशी) येथे होणार आहे.

या आंदोलनाचे आयोजन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), युवा सेना, महिला आघाडी तसेच मुळशी तालुक्यातील संलग्न संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. श्रद्धास्थानांच्या पावित्र्याचा सन्मान राखण्यासाठी आणि कथित गैरव्यवहाराविरोधात आवाज उठवण्यासाठी नागरिकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन असे आवाहन करून युवा सेनेचे नागेश साखरे यांनी माध्यमांना माहिती दिली.


शुक्रवार, १७ जुलै, २०२६

मतदार जनजागृतीसाठी जयेश शिवराज चौधरी यांचा पुढाकार; SIR प्रक्रियेसाठी नागरिकांना मोफत मार्गदर्शन


| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १७ जुलै २०२६ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) मोहिमेअंतर्गत नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य मिळावे या उद्देशाने वार्ड क्रमांक २१ चे चे भाजपा पदाधिकारी जयेश शिवराज चौधरी यांनी नागरिकांसाठी मोफत मदत व मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. या उपक्रमांतर्गत मतदार यादीत नाव शोधणे, मतदार नोंदणी व पडताळणी प्रक्रियेबाबत माहिती देणे, आवश्यक कागदपत्रांची माहिती उपलब्ध करून देणे तसेच संबंधित BLO (Booth Level Officer) यांच्याशी संपर्क साधून देणे यासाठी नागरिकांना विनामूल्य मदत केली जात आहे.

अनेक नागरिकांना SIR प्रक्रियेबाबत माहिती नसल्याने किंवा विविध तांत्रिक अडचणी येत असल्याने त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, मतदार म्हणून त्यांचे अधिकार अबाधित राहावेत आणि कोणत्याही पात्र मतदाराला गैरसोय होऊ नये या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे जयेश शिवराज चौधरी यांनी सांगितले. ज्या नागरिकांना मतदार यादी, SIR फॉर्म, नाव पडताळणी अथवा इतर निवडणूकविषयक बाबींमध्ये अडचणी येत असतील त्यांनी PWD २५/११, अशोक थिएटर समोर, श्री. जयेश शिवराज चौधरी यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत असून लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

श्रीराम मंदिर देवस्थानतर्फे खडकीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


| सांगावा न्यूज | खडकी, पुणे. दिनांक  १७ जुलै २०२६ : श्रीराम मंदिर देवस्थान, खडकी यांच्या वतीने नुकताच मंदिर परिसरात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात पंचक्रोशीतील विविध शाळांमधील ६० गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम मंदिर देवस्थानचे आधारस्तंभ पुण्यातील कुंदन स्पेसेस चे संचालक भंवरलालजी जैन उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते महेशजी चासकर तसेच श्रीराम मंदिर देवस्थानचे मुख्य विश्वस्त नरेंद्र बागनाईक व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना अधिक मेहनत घेण्याची प्रेरणा मिळावी, तसेच समाजात शिक्षणाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष नरेंद्र बागनाईक, सचिव संजय टेकाडे, खजिनदार स्नेहल पृथ्वीराज, विश्वस्त प्रशांत पृथ्वीराज, मिलिंद पोत्रे,राकेश पटेल,प्रवीण अय्यावार,विजय टेकाळे, यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमानंतर पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "श्रीराम मंदिर ही धार्मिक संस्था असूनही पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने योगदान देत आहे, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देणारे, त्यांना प्रोत्साहन देणारे आणि शिक्षणाची प्रेरणा देणारे असे स्तुत्य उपक्रम श्रीराम मंदिर देवस्थान सातत्याने राबवत असल्याबद्दल आम्हा पालकांना मनापासून अभिमान व आनंद वाटतो."
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयीची प्रेरणा अधिक दृढ होऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचे अमली पदार्थांविरोधात जनजागृती अभियान


| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड | १७ जुलै २०२६ : महाविद्यालयीन युवती - युवकांमध्ये अमली पदार्थांचा वाढता विळखा पाहता या विळख्याला आळा घालण्यासाठी तसेच अमली पदार्थ विक्री व्यापारा विरुद्ध ठोस उपाययोजना या संदर्भात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेअंतर्गत अमली पदार्थ विरोधी पथकाने विशेष जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले. डी. वाय. पाटील आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, पिंपरी येथे आयोजित या कार्यक्रमात सुमारे २५० ते ३०० विद्यार्थी विद्यार्थीनी व शिक्षकांनी सहभाग घेतला. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलिस सहआयुक्त शशिकांत महावरकर आणि अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. पोलिस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाने विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक दुष्परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमात पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विविध प्रकारचे अमली पदार्थ, त्यांचे दुष्परिणाम, एन.डी.पी.एस. कायद्यातील तरतुदी तसेच व्यसनामुळे व्यक्तीच्या आरोग्यासह कुटुंब, शिक्षण, करिअर आणि समाजावर होणाऱ्या गंभीर परिणामांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, संस्कार आणि सकारात्मक जीवनमूल्यांचा स्वीकार करावा, असे आवाहन करण्यात आले.

तसेच अमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास अमली पदार्थ विरोधी पथक (मो. ६८०००२३२३०), मानस हेल्पलाईन १९३३ किंवा पोलीस कंट्रोल रूम ११२ वर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले असून माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे तज्ज्ञ डॉ. हनुमंत हाडे यांनी तंबाखू व अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांवर मार्गदर्शन केले. तसेच विल्यम साळवी (व्यवस्थापक, विमल व्यसनमुक्ती केंद्र) यांनी व्यसनमुक्तीचे महत्त्व, व्यसनापासून दूर राहण्याचे उपाय आणि निरोगी जीवनशैलीबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पोलिस अंमलदार कपिलेश इगवे यांनी केले. विद्यार्थी व शिक्षकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पोलिसांच्या या जनजागृती अभियानाचे स्वागत केले.





अलमगीर मशीद, वाकड येथे मुस्लिम बांधवांकडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन


५१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग; मानवतेचा संदेश देणाऱ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

| सांगावा न्यूज | वाकड | दिनांक १७ जुलै २०२६ : समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपत "रक्तदान हेच श्रेष्ठदान" या भावनेतून वाकड येथील अलमगीर मशीद परिसरात मुस्लिम बांधवांच्या वतीने शुक्रवारी (दि. १७) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला मुस्लिम बांधवांसह परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण ५१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजात मानवतेचा आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश दिला.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करत, अपघातग्रस्त, गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्ण, शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेले रुग्ण तसेच विविध वैद्यकीय उपचारांसाठी रक्ताची गरज असलेल्या नागरिकांसाठी रक्तदान हे खऱ्या अर्थाने जीवनदान असल्याचे सांगितले. शिबिरामध्ये विविध सामाजिक स्तरातील युवक, नागरिक आणि मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत रक्तदान केले. रक्तदानासाठी आलेल्या प्रत्येक रक्तदात्याची वैद्यकीय तपासणी करून सुरक्षित पद्धतीने रक्त संकलन करण्यात आले. रक्तदानानंतर सर्व रक्तदात्यांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती.

या उपक्रमामुळे समाजात रक्तदानाविषयी जनजागृती होण्यास मदत झाली असून, नियमित रक्तदानाची सवय लागावी आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. भविष्यातही अशाच समाजोपयोगी आणि लोकहिताच्या उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या रक्तदान शिबिरासाठी रेड प्लस रक्तपेढी, भोसरी यांनी तांत्रिक सहकार्य केले. यावेळी रेड प्लस रक्तपेढीचे डॉ. इंदल जैस्वाल, ट्रस्टी हसनभाई शेख, फकीरभाई शेख, शाहिद शेख, जाकीर शेख, युसूफ शेख तसेच परिसरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक करत, अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात बंधुभाव, सहकार्याची भावना आणि मानवतेची जाणीव अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त केली.

नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करून विशेष सखोल पुनरीक्षणात सहभागी व्हावे : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी


एसआयआर अभियानाचा महापालिका स्तरावर आढावा मतदार यादी अचूक करण्यावर भर

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दि. १७ जुलै २०२६ : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाची प्रभावी अंमलबजावणी आणि मतदार यादीतील माहिती अचूक व अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या कामांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आढावा घेतला. यावेळी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत सुरू असलेल्या घरोघरी भेटी, अर्ज संकलन, माहिती पडताळणी तसेच नागरिकांच्या प्रतिसादाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस पिंपरी चिंचवड महापालिका उप आयुक्त सचिन पवार, मतदार नोंदणी अधिकारी संदीप खोत, अर्चना यादव, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

बैठकीत उप आयुक्त सचिन पवार यांनी विशेष सखोल पुनरीक्षण अभियानाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. बीएलओंकडून सुरू असलेल्या घरोघरी भेटी, अर्ज संकलन, प्रलंबित प्रकरणांची स्थिती तसेच मतदार नोंदणी प्रक्रियेतील विविध बाबींची माहिती त्यांनी दिली. निर्धारित कालमर्यादेत सर्व कामे पूर्ण करण्यासाठी विभागनिहाय नियोजन करून नियमित पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रत्येक बीएलओने जबाबदारीने काम करावे, असे निर्देश दिले. मतदार यादीतील प्रत्येक नोंदीची काळजीपूर्वक पडताळणी करून आवश्यक दुरुस्त्या निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.

बैठकीत बीएलओंच्या घरोघरी भेटींची प्रगती, अर्ज संकलन, प्रलंबित प्रकरणे तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांच्या निकाली काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. अभियानातील प्रत्येक टप्प्यावर नियमित आढावा घेऊन कामाची गुणवत्ता आणि गती कायम ठेवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, "विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम हा मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना आवश्यक माहिती व कागदपत्रे देऊन सहकार्य करावे. तसेच मतदार यादीतील नाव, पत्ता, छायाचित्र किंवा इतर कोणत्याही तपशीलात दुरुस्ती अथवा अद्ययावत माहिती आवश्यक असल्यास संबंधित मदत कक्षाशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत अचूकपणे समाविष्ट होणे ही लोकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक बाब आहे.

उप आयुक्त सचिन पवार यांनी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना विभागनिहाय समन्वय ठेवून विशेष सखोल पुनरीक्षण अभियानातील सर्व कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मतदार यादी अधिक अचूक, त्रुटीमुक्त आणि अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक अर्जाची वेळेत पडताळणी व निकाली काढण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. उप आयुक्त सचिन पवार म्हणाले, "विशेष सखोल पुनरीक्षण अभियान यशस्वी करण्यासाठी महापालिकेने विभागनिहाय नियोजन करून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचून मतदारांची माहिती अचूकपणे पडताळावी. नागरिकांनीही आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून सहकार्य करावे. प्रत्येक अर्जाची नियोजित कालमर्यादेत पडताळणी करून त्रुटीमुक्त आणि अद्ययावत मतदार यादी तयार करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी समन्वयाने काम करत आहेत.

पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते कि, दि. ३०/०६ / २०२६ पासून मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू झाले आहे. आपल्या नजीकच्या शाळेत आपण ज्या ठिकाणी मतदान करत आहात, तेथील बीएलओ यांना भेटून अथवा बीएलओ आपल्या घरी आल्यानंतर ईएफ फॉर्म भरून त्यास पोहच द्यावी. आपण ऑनलाईन ही फॉर्म भरू शकता त्यासाठी या lnk6.in/PCMCHO/eo6c-QYOc संकेतस्थळावर जाऊन आपण माहिती भरू शकता.
आपण Enumeration form २९/०७/२०२६ पूर्वी न भरल्यास आपले नाव प्रारूप यादीमध्ये येणार नाही कृपया नोंद घ्यावी- अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे

सांगवी दापोडीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेची युद्धपातळीवर उपाययोजना


| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दि. १७ जुलै २०२६ : सांगवी व दापोडी परिसरातील पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांनी व्यक्त केलेल्या अडचणींची पिंपरी चिंचवड महापालिकेने तातडीने दखल घेतली असून, पाणीपुरवठा अधिक नियमित, वेळापत्रकानुसार आणि सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन आवश्यक निर्देश देण्यात आले असून, पाणीपुरवठा व्यवस्थेवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगवी व दापोडी परिसरातील जलवाहिन्या, उंच जलकुंभ आणि वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. पाण्याच्या टाक्यांवर नियमित कर्मचारी उपलब्ध राहतील, वितरणाचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जाईल तसेच नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांत काही भागांत पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वितरण व्यवस्थेचे तांत्रिक परीक्षण करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी आवश्यक असेल तेथे मनुष्यबळ वाढविणे, देखरेख मजबूत करणे आणि पाणीपुरवठा नियंत्रण प्रणाली अधिक सक्षम करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याशिवाय पाण्याच्या गुणवत्तेवरही विशेष भर देण्यात आला असून, नियमित नमुना तपासणी, जलकुंभांची स्वच्छता आणि वितरण यंत्रणेवर सतत देखरेख ठेवली जात आहे. नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे महापालिकेचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रशासनाने सांगितले.

पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश बरीदे यांनी सांगितले की, "सांगवी व दापोडी परिसरातील पाणीपुरवठ्याबाबत प्राप्त झालेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून नियमित आणि वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा सुनिश्चित केला जाईल." महापालिकेने नागरिकांनाही पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले असून, पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही अडचण असल्यास संबंधित क्षेत्रीय कार्यालय अथवा पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

"सांगवी व दापोडी परिसरातील पाणीपुरवठा अधिक नियमित, पारदर्शक आणि वेळापत्रकानुसार करण्यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून जलकुंभ, जलवाहिन्या आणि पाणीपुरवठा प्रक्रियेवर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे"
__अजय सूर्यवंशी (सह शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका)

गुरुवार, १६ जुलै, २०२६

आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांना बडतर्फ करा आणि मोशी दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना नोकरीसह नागपूर दुर्घटनेप्रमाणे नुकसान भरपाई द्या - कैलास कदम इंटक प्रदेशाध्यक्ष


| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, पुणे दि. १६ जुलै २०२६ :  पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील कचरा डेपो येथे झालेल्या दुर्घटनेत ९ निष्पाप कामगारांचा बळी गेला आहे. या मृत कामगारांच्या एका वारसदाराला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कायमस्वरूपी नोकरी आणि कुटुंबाला कायदेशीर नुकसान भरपाई द्यावी. तसेच या दुर्घटनेत बचाव कार्य करण्यास पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे अपयशी ठरले आहेत. त्यांनी घडलेल्या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोब अत्याधुनिक मशीनरी मागवून बचाव कार्य सुरू करणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी तसे न करता अपुऱ्या मनुष्यबळावर व कमी मशिनरीवर दुर्घटना घडल्यानंतर चे २४ तास बचाव कार्य केले. यामुळे या अनधिकृत इमारतीत अडकून पडलेले ९ कामगार ठार झाले. प्रथमदर्शनी या घटनेत आयुक्त डॉ. सूर्यवंशी हे बचाव कार्याबाबत निर्णय घेण्यास कमी पडले असे दिसते त्यामुळे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना बडतर्फ अशी मागणी इंटक चे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष कैलास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेले पदरात कैलास कदम यांनी पुढे म्हटले आहे की, मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेचा उल्लेख मा. उच्च न्यायालयाने गंभीर दखल मुंबई महानगर पालिकेच्या कचरा वर्गीकरणावर दाखल याचिकेवर सुनावणी करताना घेतली आहे.
तसेच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे बचाव कार्य करण्यास अपयशी ठरले आहेत त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी इंटक, महाराष्ट्र प्रदेश या कामगार संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.  तसेच काही दिवसांपूर्वी नागपूर येथे घडलेल्या दारुगोळा फॅक्टरी मधील अपघातात मृत झालेल्या कर्मचाऱ्यांना आपण ८२ लाख रुपये आणि जखमींना २५ लाख रुपये नुकसान भरपाई दिली आहे. परंतु पिंपरी चिंचवड येथील या दुर्घटनेत मृत झालेल्या कामगारांना फक्त ५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मृत कामगारांच्या कुटुंबीयांना मदत करणे बाबत असा दूजाभाव योग्य नाही. तसेच मोशी येथील दुर्घटने बाबत नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने पुढील मुद्द्यांचा देखील तपास करून जबाबदारी निश्चित करावी. यामध्ये या ठिकाणी एका तळमजल्याची परवानगी असताना तीन मजली इमारत कशी उभारण्यात आली याला जबाबदार कोण. या प्रकल्पाचा पर्यावरण परवाना जून महिना केला संपलेला असताना मृत व जखमी कामगार येथे काय करत होते. परवाना संपलेला असताना प्रकल्प सुरू का ठेवण्यात आला होता. मुदत बाह्य प्रकल्प सुरू ठेवणारे अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करावी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची या प्रकल्पाविषयी जबाबदारी काय होती ? त्यांचे अधिकारी काय करत होते ? या ठिकाणी सर्व सुरक्षितता नियम पाळले गेले आहेत का ? येथील कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने, आरोग्य, वैद्यकीय सुविधा देण्यात येत होती का ? फॅक्टरी इन्स्पेक्टर कामगार उपायुक्त यांच्या स्थळ पाहणीचे अहवाल सार्वजनिक करावे. या सर्व कामगारांच्या वेतनातून ग्रॅज्युएटी, प्रॉव्हिडंट फंड, गट विमा कपात करण्यात येत होती का ? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे शहरातील नागरिकांना मिळणे अपेक्षित आहे त्यासाठी या प्रकल्पाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी अशी ही मागणी या पत्रात कैलास कदम यांनी केली आहे.