भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही तर भारतीय नागरिकांच्या सामाजिक,आर्थिक,राजकीय व सांस्कृतिक प्रगतीचा दस्तऐवज आहे__नूर खा पठाण
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २ ऑगस्ट २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध शाळांमध्ये घर घर संविधान उपक्रम राबवून भारतीय संविधान जन जागृती केली जात आहे. त्यामध्ये संविधान प्रत आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेऊन परिसरातून विद्यार्थी विद्यार्थीनी सह शिक्षकांनी काही ठिकाणी रॅली तर काही शाळांमध्ये जाऊननियोजित कार्यक्रमामध्ये विद्यार्थांना मान्यवरांनी अभ्यासकांनी मार्गदर्शन केले. "घर घर संविधान या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे ४ लाख विद्यार्थ्यापर्यंत व ८ लाख पालकांपर्यंत संविधानाची माहिती पोहचेल. त्यातून संविधानधिष्टीत जागृत समाज घडेल असा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे" असे मत पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या शिक्षण समिती सभापती रविना सागर अंगोळकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर नगरसेवक शेखर चिंचवडे धर्मपाल तंतरपाळे, नगरसेविका पल्लवी वाल्हेकर, योगिता बारणे, उपायुक्त अण्णा बोदडे, शिक्षणाधिकारी संगीता बांगर, संविधान अभ्यासक व माणगाव पॅटर्न चे प्रमुख नूर खा पठाण, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले, "संविधानाची मूल्ये आणि उद्देशिकेचा खरा अर्थ आपल्या बालवयापासूनच मुलांच्या मनावर रुजणे अत्यंत आवश्यक आहे. याच उदात्त हेतूने पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागामार्फत संपूर्ण मनपा क्षेत्रात 'घर घर संविधान' हा एक अत्यंत प्रेरणादायी विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. बालवयातच संविधानाची ओळख आणि त्यातील लोकशाही, समता, बंधुता ही मूल्ये आत्मसात केल्यास उद्याची पिढी अधिक सुसंस्कृत, जबाबदार आणि जागरूक नागरिक म्हणून घडेल, यात शंका नाही. आपल्या भावी पिढीमध्ये संविधानाबद्दलचा आदर आणि जाणिवा अधिक दृढ करण्यासाठी या सुंदर उपक्रमात सहभागी व्हावे"
"भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही तर भारतीय नागरिकांच्या सामाजिक,आर्थिक,राजकीय व सांस्कृतिक प्रगतीचा दस्तऐवज आहे. दररोज संविधानाच्या एका कलमाची माहिती व त्याचे विवेचन या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थाना देण्यात येणार आहे. त्यामुळे संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्याची जाणीव विद्यार्थ्यांना होईल. सुजाण व सुज्ञ नागरिक घडण्यास मदत होईल" असे मत संविधान अभ्यासक नूर खा पठाण यांनी व्यक्त केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा