विद्यार्थ्यांना सैनिकांच्या त्यागाची जाणीव होऊन देशसेवेची प्रेरणा मिळाली ___बाबासाहेब राठोड (मुख्याध्यापक)
| सांगावा न्यूज | थेरगाव, दिनांक२६ ऑगस्ट २०२६ : भारतीय सीमांचे रक्षण करणाऱ्या शूर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पीएम श्री माध्यमिक विद्यालय, थेरगाव येथे विद्यार्थिनींसाठी राखी बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध रंगांच्या, आकर्षक व वेगवेगळ्या आकारांच्या राख्या तयार केल्या. दिनांक २५ ऑगस्ट रोजी विद्यार्थिनींनी प्रेमाने तयार केलेल्या या राख्या भारतीय सीमांचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांना पाठविण्यात आल्या.
घरापासून व कुटुंबापासून दूर राहून देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या जवानांसोबत भारतीय कुटुंब म्हणून आपण रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त बहीण म्हणून मुलगी म्हणून सैनिकांसोबत आहोत , असा भावनिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती तसेच सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. राख्या तयार करताना विद्यार्थिनींमध्ये विशेष उत्साह दिसून आला. सैनिकांप्रती असलेला आदर आणि देशभक्तीची भावना त्यांच्या कृतीतून प्रकर्षाने जाणवली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बाबासाहेब राठोड, पर्यवेक्षिका श्रीमती हर्षदा राऊत, श्रीमती मंगल आव्हाड, श्रीमती सोनाली जाधव, श्रीमती तुपे तसेच इतर सर्व शिक्षकांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.
यावेळी मुख्याध्यापक श्री. बाबासाहेब राठोड म्हणाले, “विद्यालय मागील तीन वर्षांपासून सैनिकांना राख्या पाठविण्याचा उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती व देशप्रेमाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत.”
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सैनिकांच्या त्यागाची जाणीव होऊन देशसेवेची प्रेरणा मिळाली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा